Tuesday, April 1, 2014

लोकशाही मंदिराच्या सहवासात.................



लोकशाही मंदिराच्या सहवासात.................

फत्तेपूर सिक्रीचा लाल दगड वापरल्याने जिचे सौंदर्य उठून दिसत आहे...जिला 12 असे भव्य दरवाजे आहेत....1140 व्यासाची भव्य इमारत... प्रत्येक भारतीयाचे या वास्तूला वास्तवात पाहणे हे स्वप्नच असते. रानडे मध्ये आल्यापासून व दिल्ली टूर असा काही प्रकार असतो, हे कळाल्यापासून मी देखील ती वास्तू पाहण्याचे स्वप्न पाहत होतो. ही वास्तू एखादे धर्मिक मंदिर नाही वा राजवाडा . ती आहे भारताची संसद. जिथून या लोकशाही प्रधान देशाचा राज्यकारभार चालतो तर कधी कधी इथंच त्या लोकशाहीचा बाजार देखील भरतो. दिल्ली टूर च्या निमित्ताने संसद पाहण्याची संधी मिळाली.
संसद..जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही शासन पद्धतीचे मुख्य केंन्द्र. भारतीय संसद म्हणजे प्रत्येक भारतीयांसाठी व लोकशाहीच्या अनुयांयासाठी मंदिरच... ज्या मंदिरात फक्त संविधान हा एकमेव धर्म पाळला जातो तर या धर्मात स्वातंत्र्य समता बंधूता व सर्वांना न्याय ही चार वर्ण पाळली जातात.
आंबेडकर, गांधी, शिवाजी व \w$boo देशात समानता एकात्मता यांचे पुतळे या वास्तू बाहेर उभे आहेत. जणू ते या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधींना लोकशाही संवर्धन व संरक्षणाची जाण करून देत असतील. लाल दगडातील या वास्तूचे प्रत्येक कोपऱ्यातील रूप मनात साठवण्यासाठीच असल्याची जाणीव संसद भवन पाहताना होते.
लोकसभा राज्यसभा हे संसदेतील दोन मुख्य हाल. दूरदर्शनच्या माध्यमातून दिसणाऱ्या या ठिकाणी आपण आहोत यावर आपला विश्वासच बसत नाही. सभागृहांची रचना, त्यांचा पुस्तकांमधून वाचलेला इतिहास आठवायला लागतो. हीच ती ठिकाणे जी देशाच्या भवितव्याबाबत मागील 60 वर्षांपासून झालेल्या चर्चा व वादाची साक्षीदार आहेत. हे सभागृह पाहताना 50 वर्ष मागे जाणारे विचार मी थांबवू शकत नव्हतो.
संसदेतील मुख्य आकर्षण म्हणजे सेंट्रल हाल, याच ठिकाणी वसाहतवादी ब्रिटीशांकडून 1947 ला भारताला सार्वभौमत्व मिळाले. सत्तेचे हस्तांतरण ज्या हाल मध्ये झाले तो हा 196 फूट व्यासाचा हाल आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च बांधकामाचा नमुना म्हणून पाहिला जातो. इथं उभं असताना देशाचा इतिहास अभिमानाने डोळ्यासमोर उभा राहतो. या हालच्या दगडांनी राज्यघटना देशाला स्वाधीन करतानाचे क्षण अनुभवले असतील. आंबेडकरांनी याच ठिकाणाहून ते प्रसिद्ध राज्यघटनेवरील भाषण केले होते. लोकशाही प्रदान राष्ट्र म्हणून उदयाला येताना संविधानाचा गैरवापर कसा देशाला विघातक ठरू शकतो, हे सांगणारे ते भाषण आजही हे सभागृह आठवत असेल का ?
या इमारतीनं 1947 पासून आजतागायतचा देशाचा विकास पाहिला असेल व त्यावरील चिंतन ऐकले असेल. इथंच लोकशाहीची जोपासना झाली. 67 वर्षांच्या इतिहासात अनेक हल्ले पचवत लोकशाही स्थिर राहिल्याची संसद साक्षीदार आहे. वैचारिक, शाब्दिक हल्ले सहन करणाऱ्या या संसद भवनाने 2001 मध्ये गोळ्यांचा वर्षाव सहन केला. लाल दगडांनी बांधलेल्या भिंतीच्या सौंदर्यांवर गोळ्यांनी निर्माण केलेली छिद्रं हल्ल्याची आठवण करून देतात. तरी आज देखील ती तेवढ्याच खंबीरपणे देशातील अर्थिक, सामाजिक व राजकिय अरिष्ठांना तोंड देत लोकशाहीला जोपासण्यासाठी सक्षमपणे उभी आहे.
अभिमानाचे आनंदाचे क्षण माझ्या आठवणीत, विचारात पेरणारी ही वास्तू, तिचा तो राजेशाही थाट आयुष्यभरासाठी मनात आठवणीचे घर करून राहिल. भविष्यात चर्चेत, वर्तमानपत्र, टि.व्ही च्या माध्यमातून संसद भवन दिसले तरी दिल्ली सहलीच्या निमित्ताने दोन- अडीच तास न्याहाललेले संसद भवनाचे मनात साठवलेले चिरंतन सौंदर्य डोळ्यासमोर उभे राहिल....

No comments:

Post a Comment