'आप' चा रेन बसेरा
काही दिवसांपूर्वी विभागाच्या अभ्यास सहली निमित्त दिल्ली ला जाण्याची संधी मिळाली. लोकसभा निवडणूकीच्या वातावरणात दिल्लीला गेल्यामुळे राजकारणाचेच विचार चालू होते. दिल्ली म्हणजे आम आदमी पार्टी असे समीकरणच निर्माण झाले आहे. दिल्लीतल्या प्रत्येकासोबत बोलताना केजरीवाल व आप बद्द्ल चर्चे व्हायचीच. आम्ही ज्या गाडीतून फिरत होतो त्या गाडीच्या चालकासोबत या विषयावर सतत बोलणं व्हायचं. केजरीवालांच्या राजकारणापेक्षा त्याने दिल्लीत केलेल्या कामावर चालक व दिल्लीतले लोक खुश होते. पर्यटन व्यवसायात गाडी चालवणाऱ्या या माणसाला सतत पोलिसांना हप्ता द्यावा लागायचा. पण आप चे सरकार आल्यानंतर या भ्रष्टाचारी पोलिसांमध्ये एवढा दरारा निर्माण झाला की, त्यांनी हप्ता वसूली करण्याऐवजी यांच्या अडचणींची विचारपूस करायला सुरूवात केली. सामान्य माणसाचे जीवन जगणाऱ्या या चालकाला त्याच्या कष्टाच्या कमाईचे संरक्षण करणारे सरकार मिळाले होते. बाकीच्या गोष्टी गौण होत्या. आप चे सरकार आल्यानंतर सामान्य माणसाला महत्त्व न देणारा सरकारी कार्य़ालयातील कर्मचारी आदराने त्याच सामान्य माणसाची विचारपूस करू लागला होता. हा बदल सामान्य दिल्ली करांसाठी स्वताचं अस्तित्व दाखविणारा होता.
एका दिवशी असेच दिल्लीतून फिरत असताना, मला बोलवून तो म्हणाला साब ओ देखो. जुन्या मोडक्या तोडक्या बसेस उभ्या होत्या, खिडक्यांवर मळकट कपडे वाळू घातले होते. पुढे तर बसच्या ठिकाणी काही कंटेनर वापरली होती. आत मध्ये झोपण्यासाठी मजली पलंगांची व्यवस्था करण्यात आली. हाच तो आम आदमी पार्टी ने गरिबांसाठी, भीक मागणाऱ्यांसाठी, बेघरांसाठी तयार केलेला रेन बसेरा. टाकाऊ तून टिकाऊ करण्याचा आपण सतत प्रयत्न करत असतो. टाकाऊ बसेस वा कंटेनरर्स चा वापर करून बेघरांसाठी आसरा निर्माण करून देण्याचा आप चा प्रयत्न दिल्लीकरांना नक्कीच भावलेला दिसतोय. देशाच्या संविधानाने निवारा हा मुलभूत हक्क सर्व नागरिकांना दिला आहे. त्यात गरिब असो वा भिकारी. देशात राहताना हक्क त्यांना मिळायलाच हवा. पावसाळा असो वा हिवाळा बेघरांची रात्र पदपथावरच निघायची. हा प्रश्न समजून घेऊन, या गरिबांच्या जीवनात तात्पुरतं का होईना हक्काचं छप्पर आप च्या सरकारनं दिलं.

No comments:
Post a Comment