Thursday, May 21, 2015

दुष्काळही मला एफ. सी. रोडवर भेटला

मे महिना नुकताच सुरू झालेला, परिक्षा चालू होत्या. दिवसभर वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या भूमिका असणाऱ्या लोकांची तीन व्याख्याने एेकण्याची संधी आज परत एकदा मिळाली होती. पुण्यप्रसन वाजपेयी, अजित अभ्यंकर, विनय सहस्त्रबुद्धे...

रात्रीचे ११ वाजलेले, रविवारच्या दिवशी लाखो पाऊले आपल्या अंगावर घेतलेला एफ.सी रोड शांत झाला होता. मोजके हॉटेल चालू होते. काही बंद होण्याची तयारी करत होते. दिवसभर लोकांसमोर भीक मागणारे हात आता फूटपाथवर शांत पडलेले होते. 

रविवारी मेस बंद , त्यातच महिन्याचा पहिला आठवडा म्हणजे खिशात थोडे फार पैसे असल्याने कुमठेकर रस्त्यावरचा मिलन खानावळीमध्ये कोल्हापूरी रस्स्यासोबत जेवणाचा बेत उशीरा का होईना यशस्वी झाला होता. कुमठेकर रोड, झेड ब्रिज, डेक्कन बस स्टॉप, गुडलक करत पायं रूम कडं चालत होती. सोबत मित्र अजय होता. सतत अबोल असणारा अजय आज जेवताना भरभरून बोलला होता. त्याच्या कामाबद्दल, लोकं करत असलेल्या अवास्तव अवाढ्व्य खर्चाबद्दल तो खुलून बोलला होता. त्या आनंदात रूम कडं चाललो होतो. गुडलक चौकात भांडारकर रोडच्या सुरूवातील पोलिसांकडून गाड्यांची तपासणी चालू होती. 

डेक्कन कडून प्रयाग हॉस्पिटल समोरून आल्यावर गुडलक चौकातून उजवीकडं वळालं की लगेच सोनवणेंचा बुक स्टॉल लागतो. नुकताच दहा वर्षानंतर सीपीएम च्या केंद्रिय स्तरावर बदल होवून सीताराम येचूरी नवे सचिव बनले. त्यावर आधारित तहेलका या मासिकाचा अंक बाजारात आला होता. पण तरूण तेजपाल प्रकरणानंतर पुण्याच्या मोजक्याच स्टॉलवर अंक उपलब्ध असतो, त्यामुळे मिळायची मारामार असते. रात्री ११ वाजता चालू असलेल्या सोनवणे च्या स्टॉलवर चालत चालत चौकशी केली अंक आहे का? अंक होता. तहेलका चा अंक वाचणं म्हणजे एक सर्वांपेक्षा नवीन आशय वाचायला मिळणार याची खात्री...रूमवर जायची वाट कशाला पहायची म्हणून अंक चाळत चाळतच हॉर्न ओके प्लीज समोरून रस्ता क्रॉस करून आर्यभूषण प्रेस कोपऱ्यावरच्या गोखलेंच्या पुतळ्यापासून रानडे इन्स्टिटयुट कडं फूटपाथ वरून चालायला सुरूवात केली. अंक चाळता चाळता सीताराम येचूरी यांच्या विषयी अजय सोबत चर्चा चालू होती. आर्यभूषण च्या कोपऱ्यावरील वडापाव वाला आता गाडा आवरायच्या तयारीत होता. अजय रस्त्याच्या बाजूने आणि मी आर्यभूषण प्रेसच्या कंपाऊंडच्या बाजूनं चालत निघालो होतो. रानडे इन्स्टिटयुटसमोरच्या पीएमपीएमएल च्या बसस्टॉपवर तुरळक गर्दी होती. बसस्टॉप सुरू व्हायच्या कोपऱ्यावर एक १२ १३ वर्षाचा पोरगा, चेहरा काळा पडलेला, कपाळावर टिळा लावला होता, रस्त्याकडं तोंड करून बसलेली, आम्हांला पाठ करून बसलेली बँग घेऊन बसलेली बाई कदाचित त्याची आई असावी, तिच्या मांडीवर एक लहान लेकरू दिसत होतं.

अजय रस्त्याच्या बाजूनं चालत असल्यामुळे त्या पोरानं अजयला थांबवलं आणि अजयला म्हणाला "भाऊ, एक मिनिट".
आता माझं कॉलेज एफ सी रोड वर असल्याने याची दररोज सवय झालेली. एफ. सी रोड असे कित्येक लोक लहान पोरं अश्या परिस्थित वावरत असतात. पण एवढ्या उशीरा हा पोरगा विचारतोय म्हणंटल्यावर थोडं पुढं गेलेला मी वापस आलो. विचारलं "काय". पोरगा म्हणाला "दुसऱ्या गावावरून आलोय, पैसे नाहीत, दहा रूपयं द्या भाऊ". मी मराठवाड्यातला असल्यानं त्या पोराच्या भाषेचा टोन मराठवाडी वाटला. आत्ताच जेवण झालेलं, त्यात तो तहेलका चा अंक घेतलेला त्यामुळं खिशात जेमतेम पैसा उरलेला. आता तो पोरगा खरं बोलतोय का? याचा विचारही मनात आला नाही आणि हात आपोआप खिश्याकडं गेला. काढून १० रूपये दिले त्या पोराला. पैसे देताना नजर त्याच्या आईकडं गेली आणि दहा रूपयात तिघांचं काय होणार हा विचार मनात येऊनच गेला. मग त्या पोराला म्हंटलं चल इथं कोपऱ्यावर वडापाव मिळतो घेऊन देतो. बसस्टॉप ते आर्यभूषण कोपऱ्यावरचा वडेवाला यांच्यातलं अंतर १० सेकंदाचं. त्याची आई ओरडत होती तिकडं कुठं जातोस इकडं स्टेशनकडं जायचंय आपल्याला. पोरानं माईला सांगितलं वडापाव आणतो म्हणून..मग त्याला विचारलं कोणत्या गावचा, इकडं कसं काय?
पोरगा म्हणाला "परभणी" मला त्या भागात फिरल्यामुळं थोडीफार माहिती. म्हणून विचारलं परभणीचा कुठला. त्यानं लगेच उत्तर दिलं गावाचं नाव सांगितलं आणि म्हंटला जिंतूर जवळ गाव हाय. इकडं कसं काय विचारलं तर म्हणाला " आमच्याइकडं दुष्काळ पडलाय, काम नाही काही म्हणून काम बघायला आलोय इकडं"
मी ही मराठवाड्यातला. मराठवाडा आणि दुष्काळ यांचं जिव्हाळ्याचं नातं. आम्हीही लहानपणी उन्हाळ्यात सोसायटीतल्या पाण्याच्या टाकीवर पाण्यासाठी रांगा लावून बसायचो. मागील पाच सहा वर्षापासून लातूर शहराचा पाण्याचा प्रश्न सुटलाय. त्यामुळं दुष्काळाची तीव्रता काही जाणवत नाही. ८ १५ दिवसाला पाणी येतंय. मग घरातले लहान मोठ्या भांड्यासह २ ३ बँरेल हौद आम्ही आजही भरून ठेवतो. मागील चार वर्षापासून पुण्यात आहे. त्यामुळं दुष्काळ या शब्दाचा संबंध फक्त पेपर वाचताना आणि रानडेच्या कँन्टीनमधल्या चर्चांमध्येच यायचा. मागच्या डिसेंबरमध्ये गावाकडं गेलतो तेव्हा ओसाड पडलेली शेतं पाहून बाप म्हणाला होता यावर्षी अवघड आहे लय. ऑक्टोंबर पासून एवढं अवघड असून सुद्धा, लातूरला गेल्यावर पेपरमध्ये वाचलेल्या आत्महत्या वाचूनसुद्धा माध्यमांना आणि मलाही दुष्काळ जाणवतच नव्हता. कारण पुण्यात कसला आलाय दुष्काळ, पेपरमध्ये कुठंतरी कोपऱ्यात आलेल्या दुष्काळाच्या आणि आत्महत्येच्या बातम्या तीव्रता कमी करत होत्या. सगळं कसं आलबेल चाललंय हे दाखविणं चाललं होतं. दुष्काळासंबंधीच्या माहितीचाच माध्यमात दुष्काळ पडलाय असं वातावरण सगळं आजूबाजूला...

आणि आज हा दुष्काळ एका आक्राळ विक्राळ स्वरूपात मला माझं खरं रूप जागा दाखविण्यासाठी एफ सी रोडवर भेटला होता. दुष्काळ म्हंटलं की स्थलांतर आलंच. १९७३ ७४ पासूनच्या दुष्काळानंतर मराठवाड्यातून स्थलांतराचं प्रमाण वाढलेलं. हे स्थळांतर पुण्याकडं अधिक. पिंपरी चिंचवड, भोसरी काळेवाडी कात्रज हडपसर भागात बहुतांश मराठवाड्यातलीच लोकं. दुष्काळात आलेले. आजही मराठवाड्याचं भीषण वास्तव आपल्याला माहित नसलं तरी पुण्यात येणारे लोक थोडंच थांबणार आहेत. विकासाचं केंद्रिकरण झालं की लोकसंख्याही तिकडं केंद्रित व्हायला चालू होते. असो.

बोलता बोलता वडापावच्या गाड्यावर आलो. वडापाव वाला ओळखीचा. साहेब पाव नाहीत सांगू लागला. मग म्हणाला फक्त वडा देवू का? वडा घेऊन परत वापस फिरलो, त्या पोराला विचारलं शिक्षण किती झालं. त्यानं उत्तर दिलं चौथी.
आता काय काम करणार विचारल्यावर म्हणाला बघू जिथं भेटंल तिथं करीन. सलग दोन दिवसाचं काम भेटलं तर रूम करीन, आत्ता मात्र झोपायला स्टेशन वर.
त्याचं बोलणं ऐकून आवसान निघून गेलेलं. कसं जगत असतील हो ही माणसं. दुष्काळावर दुष्काळग्रस्त भागात न राहता बोलणाऱ्या आपण सर्वांना खरंच जगण्याची अस्तित्वाची ही धडपड आपल्या माध्यमात लिखाणात साहित्यात तेवढ्याच प्रखरपणे मांडता येईल का?
शेवटी न रहावून विचारलं बाप कुठं हाय. म्हणाला गावाकडं तो नाही आला इकडं.
एवढं बोलेपर्यंत बसस्टॉप आलता. मग तो फूटपाथवरून उतरून रस्त्यावर बसलेल्या आईकडं गेला. मी आणि अजय मात्र हादरल्यासारखं पुढं निघालो. कदाचित हे हादरणं फक्त सुरूवात होती काही मनातले बुरूज शिल्लक असतील म्हणून की काय पुढं अजून घडायचं बाकी होतं.
रानडेच्या गेटसमोर पोहचतो न पोहचतो तर तोच पोरगा त्याची माय आवाज देत आले. तोंडावर गोंदल्याच्या खूणा स्पष्ट दिसत होत्या गळ्यात फक्त काळा दोरा दिसत होता. पोराच्या खांद्यावर बँग होती. बँगचे खालचे दोन्ही कोपरे फाटलेले त्यातून आतले कपडे बाहेर लोंबत होते.
बाई म्हणाली "इथं जवळ दवाखाना हाय का, कमरेवरच्या लेकराकडं पाहत म्हणाली. पोराला लय ताप आलीय." तिच्या त्या बोलण्याने काहीच कळेनासं झालं. एक तर रात्रीचे ११ वाजलेले त्यात एफ. सी रोड वर एखादा दवाखाना आठवण्याची क्षमताच राहिली नव्हती. त्यात त्यांच्याकडं खायला पैसे नव्हते मग दवाखान्याचं कसं...मनात अनेक प्रश्न अस्वस्थता निर्माण झाली होती. अजयही शांतच होता पण त्याच्याही मनातली अस्वस्थता काही लपत नव्हती. थोड्याच वेळापूर्वी जेवताना तो बोलत होता, वाढदिवसांच्या इव्हेंटमध्ये होणारी उधळपट्टी पाहवत नाही...
कदाचित त्या बाईला हे सगळं मनातलं जाणवलं असावं. ती म्हणाली,"दवाखाना सांगा, डॉक्टर ला बोलते मी जे बोलायचय ते".
माझ्या तोंडातूनही लगेच प्रयाग हॉस्पीटलचं नाव निघालं. त्यांना पत्ता सांगितला. थोडे फार पैसे द्यावे म्हंटलं तरी खिशात पैसा नव्हता. रानडे इन्स्टिटयुटपासून रस्ता क्रॉस करत वाडेश्वर कडून प्रयाग हॉस्पीटलकडं दिशेने ते तिघं निघाले होते. कंबरेवरचं ते पोर डोळ्यात डोळे टाकून माझ्याकडं दूरवर जाईपर्यंत पाहत होतं. त्याचे ते माझ्याकडचं पाहणं आज २० दिवसानंतरही जसच्या तसं आठवतंय मला...
विकास असाच जर एफ सी रोड भोवतीच केद्रिंत होणार असेल तर कदाचित कधी ना कधी दुष्काळाच्या झळाही आम्हांला याच एफ सी रोड वरच जाणवल्याशिवाय राहणार नाहीत.. दिवसभरात तीन व्याख्यानामध्ये दुष्काळ कुठंच जाणवला नाही. दिवसभर तीन व्याख्यानं परत आवडतं मासिक भेटलं यातच समाधान मानून झोपण्याच्या आरामाच्या तयारीत असताना आपली झोप उडावी असा अनुभव यायलाच हवा...कदाचित आपल्या व्यवस्थेचं पण हेच झालंय...मुख्य समस्या कुठंच जाणवत नाहीयेत. आणि ज्या समस्याच नाहीयेत त्याच समस्या समजून आपण प्रयत्न करत असतो आणि त्याचाच आनंद साजरा करण्याच्या तयारीत असतानाच हादरा देतं कोणी तरी....मग येते अचानक एकदम खडबडून जाग....

लेखकाचे इतर वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/

No comments:

Post a Comment