Tuesday, February 17, 2015

परत एक दहशतवादी हल्ला

       काल रात्रीच "पेन हत्यारापेक्षा कशी ताकदवान असते" या संबंधीचा एक निबंध वाचत होतो. आणि आज सकाळी दहाच्या सुमारास फोन मेसेजेस् येऊ लागले, कोल्हापूरमध्ये कम्युनिस्ट नेते विचारवंत लेखक कॉ.गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी कॉ.उमा पानसरे यांच्यावर हल्ला झाला आहे. दोघांनाही गोळ्या लागल्यात आणि परिस्थिती गंभीर आहे याची जाणीव व्हायला वेळ लागला नाही.
       तेवढ्यात लहानपण आठवायला सुरूवात झाली. घरात पुस्तकाच्या कपाटात खूप सारी पुस्तकं होती आजही त्यात भरच पडत आहे. मग त्या सगळ्यातून एक पुस्तक लक्ष वेधून घ्यायचं, पांढरं कव्हर त्यावर जाडजूड अक्षरात लिहिलेलं नाव आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. मोठ्या मोठ्या पुस्तकांपेक्षा हे ५० ६० पानांचं पुस्तक हातात घ्यायला वाचायला बरं वाटायचं. समजत काही नव्हतं पण वाचायचं तसंच. ते पुस्तक होतं गोविंद पानसरे याचं "शिवाजी कोण होता?". पहिली ते चौथी पर्यंतच्या राज्य शासनाच्या पुस्तकातून भवानी मातेने तलवार दिलेल्या शिवाजीची  ओळख तर झाली होती पण "जाणता राजा" शिवाजीची ओळख पानसरेंनी राज्यातल्या माझ्यासारख्या लाखोंना करून दिली असेल.
         पण आज दाभोळकरांपाठोपाठ दाभोळकरांच्या हत्येसारखाच पानसरेंना संपविण्याचा कट रचण्यात आला. त्यामधल्या काळात पुण्यात सीपीएमच्या कार्यालयावरही हल्ला करण्यात आला होता. महाराष्ट्रातील हल्ल्यांची ही मालिका संपायचं काही चिन्ह आज तरी दिसत नाहीये. एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद्यांनी कट्टरधर्मींयांनी थैमान घातले आहे. मग त्यात पेशावर, चार्ली हेब्डो सारखी ताजी उदाहरणं आहेतच. त्याचा निषेध करण्यासाठी आमच्या हिंदूस्थानवासीयांचा उत्साह शिगेला गेला होता. जसं मुताऱ्यांच्या भिंतीवर कागदं चिकटावून घाण भिंती तयार होतात तश्या आमच्या फेसबुक वॉल निषेधानं भरल्या होत्या, का ? तर मुस्लीम ना?.तसं पाहिला तर गांधी, दाभोळकर, पानसरे यांच्यावर हल्ला करणारे मुस्लिम नव्हते ना म्हणून आमच्या साठी हे हल्ले दहशतवादी वाटतच नाहीत. तर दुसरीकडं आमच्या या देशात सामाजिक कार्यकर्त्यांचे, विवेकवादी विचारवंतांचे समाजातील दलित शोषितांचे सातत्याने खून होत होते. काही खून समोर आले तर काही तसेच पचवले गेले. त्यामुळे धर्माच्या नावावर चालू असलेल्या या हत्यांचे काय? ज्याप्रमाणे २६/११ चा दहशतवादी हल्ला देशासाठी घातक होता तेवढेच घातक दाभोळकर पानसरे यांच्यावरचे हल्ले. बाहेरच्या जगात जे चालू आहे ते दहशतवादी आणि आमचं म्हणजे राष्ट्रवादी ? असं कसं चालेल ना.
         आज पानसरेंवर झालेला हल्ला देखील परकिय राष्ट्रविघातक शक्तींनी केलेल्या हल्ल्या एवढाच तीव्र दहशतवादी हल्ला होता. फरक एवढाच बाहेरचे एका विशिष्ट धर्माचे आहेत तर आतले देखील एका विशिष्ट धर्माचेच आहेत. फरक आहे तो फक्त धर्माच्या नावाचा. विशिष्ट राष्ट्रनिर्मितीच्या रस्त्यात ज्यांनी कम्युनिस्टांना नंबर एकचा शत्रू मानलं आहे तेव्हा पूर्ण राजकीय शक्ती हातात आल्यानंतर स्वप्न पूर्ण करायचे प्रयत्न तर होतीलच ना. त्यामुळे भविष्यात असे अनेक दहशतवादी हल्ले पहावयास मिळतीलच. पण एक गोष्ट नक्की आहे, ८२ वर्षाच्या वृद्धास गोळ्या घालण्याची गरज जेव्हा जाणवत असेल तेव्हा त्या गोविंद पानसरेंच्या विचारांची लेखनाची ताकद लक्षात येते. आजही या देशातील डावे लोक एक सक्षम वैचारिक पर्याय म्हणून जातीयवादी धर्मांध व भांडवली शक्तीपुढे उभे आहेत. कोणी कितीही ओरडलं की डावे संपले आहेत तरी सर्व सत्ताकेंद्रे हाती असताना असे भ्याड हल्ले करून समतावादी मानवकेंद्री विचार मांडणारे लोक आजही लढा देत आहेत आणि ते विचार आपल्याला काही सहजासहजी अराजकता माजवू देणार नाहीत म्हणून हे दहशत पसरविण्यासाठी दहशतवादी हल्ले चालू आहेत. या अशा हल्ल्यांमध्ये फक्त हल्लेखोरच नाही तर इथल्या लोकशाही धर्मनिरपेक्ष विचारांना मारक असणाऱ्या प्रवृत्तींना निवडून देणाऱ्या आपल्या सगळ्यांचेच हात दाभोळकर पानसरे यांच्या रक्ताने बरबटलेले आहेत, आपण सगळेच दहशतवादी आहोत. पण मानवी कल्याणाचा लढा हा सातत्याने चालणारा खंडित न होणारा लढा आहे. त्यासाठी अनेकांचा जीव गेलेला आहे हत्या झालेल्याच आहेत होतीलही पण विचार आजही जिवंत आहेत मग ते विचार क्षत्रियासारखेच असावेत कारण ते संपविण्यासाठी परशूराम नावाच्या गृहस्थाला २१ वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करावी लागली होती म्हण त्यामुळे आमचे हे विचार संपविण्यासाठी गोडसेंची फौज देखील कामाला लावली तरी विचार काही समूळ नष्ट होणार नाहीत. त्या विचारांचे अंकूर उगविल्याशिवाय राहणार नाही. लोकशाही धर्मनिरपेक्ष नसलेलं सरकार सत्तेत असलं तरी पानसरे व चुकून मोकून सापडले तर दाभोळकरांच्या हल्लेखोरांना देखील ते लवकरात लवकर पकडतील व शिक्षा देतील व  बाह्य दहशतवादावर बोंबा मारणाऱ्या तथाकथित राष्ट्रप्रेमींसमोर अंतर्गत दहशतवादाचा खरा चेहरा उघडा करतील, संस्कृतीच्या नावाखाली जीव घेणाऱ्यांचा बुरखा फाडतील अशी अपेक्षा करण्यात चूक नाही. शेवटी विवेकाचा आवाज बुलंद झाल्याशिवाय राहणार नाही.
       लोकशाही धर्मनिरपेक्षता जिंदाबाद!

लेखकाचे इतर वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/

No comments:

Post a Comment