Wednesday, December 17, 2014

परंपरांची खांदेकरी तिनंच का व्हायचं?

शिकणारी लेकरं  घरात असताना घरातील व्यक्ती अचानक मृत पावली तर काय? घरात शिकणारी मुलं आहेत, त्यांच्या शिक्षणाचा विचार समाज व तथाकथित नातेवाईक करतीलच, असे ही नाही. परत त्यात मुलगी असेल तर वेगळंच....नक्की काय असतात हो या परंपरा, मला तर समजल्याच नाहीत. घरातील व्यक्ती मेली तर घरातील मुलांची लग्नं एका वर्षातच करायचे नाहीतर  तीन वर्षानींच करायची. अशी एक भोंगळ परंपरा आमच्या आजूबाजूला आहे. समजा एक वर्षानंतर आणि तीन वर्षापूर्वी लग्न झालंच तर काय होणार? याचं उत्तर सुध्दा कोणी द्यायला तयार नाही. असाच एक अनुभव.
ओळखीतले एक काका वारले. त्यांच्या मागे दोन मुलं एक मुलगी पत्नी असा परिवार. तसं त्यांचं जाण्याचं वयही नव्हतंच. घरची परिस्थिती तसी चांगली.   मोठा मुलगा नुकताच नौकरीला लागलेला. दुसरा चांगल्या प्रकारे शिक्षण घेतोय. सगळ्यात लहान मुलगी..ती सुद्धा शिक्षण घेतेय. वडिलांचं निधन होवून दोन तीन महिने होतात तेच पाहुणे नामक समाज सेवकांनी ( कारण त्या कुटूबांची काळजी यांनाच आहे, असं भासविण्याकडे पाहुण्यांचा कल असतो ) एक वर्ष आणि तीन वर्ष वाली परंपरा या घरच्यांना सांगण्यास सुरूवात केली. लग्नाची दलाली करणाऱ्या नातेवाईकांची संख्या तर कोणाकडेच कमी नसते. लग्नाचा विषय निघाला की काहीजनांकडे विविध पर्यायसह विविध प्रकारची स्थळं उपलब्ध असतात. मुलांनीही कधी समाजात डोकावण्याची हिंम्मत दाखवली नव्हती. त्यामुळे नातेवाईक म्हणतील ती पूर्व दिशा समजून तिघांपैकी एकाचं लग्न लावायचा निर्णय एकमतानं झाला असावा. निर्णय तर झाला पण लग्न  करायचं कोणाचं हे कोणालाच कळेना. मोठ्याला नुकतीच नौकरी लागली होती, त्याचं लग्न लावायला कदाचित कसलीही अडचण नसावी, पण घराची जबाबदारी आपल्यावर आहे हे पटवून देण्यात तो यशस्वी झाला असावा. दुसरा शिक्षण घेत असल्यामुळे तो स्पर्धेतच नसावा कदाचित. राहिली ती मुलगी...तिची इच्छा वगैरे पहायला तो बाप देखील आता नव्हता. समाजानं मांडलेल्या या परंपरांच्या बाजारात जायचा तो तिचाच बळी दिला जावा हे आपोआपच निश्चित होणार होतं. झालंही तसंच. तिच्या लग्नाचा निर्णय झाला. वडीलधारे आणि त्यांच्यात आपले मत मांडायची कदाचित धमक वडिलांनीच तयार होवू दिली नसेल. तीन महिन्यापूर्वी वडील वारलेत. अर्धवट शिक्षण सोडून, शिक्षण पूर्ण करून करियर घडवायची स्वप्न तिनं गुमान मोडलीच असणार. पण तिनंच का मोडायचं सगळं, सगळं तिनंच का सोडायचं अर्धवट.  घुसमट जाणवली नसेल का तिच्या भावनांची कुणाला? कोणत्या परिस्थितीमध्ये आकार द्यायचं तिनं घराला. कसं पचवायचं दु:ख वडिलांच्या एकाएकी जाण्याचं, कसं पचवायचं दु:ख शिक्सन अर्ध्यावरी सोडल्याचं. पण शेवटी हे कोणासाठी चाली रिती रूढी मानल्याचं सुख सगळ्यांना भेटेलच फक्त तिचा एकटीचाच बळी दिल्यामुळे....काय झालं असतं हो कोणाचंच लग्न झालं नसतं तर...वडिलांना वाईट वाटलं असतं? काय झालं असतं भावांनी लग्न केलं असतं तर? काय झालं असतं एखाद्या नातेवाईकाने विरोध केला असता व समर्थन केले असते शिक्सन चालू ठेवण्याचे. असी अनेक पकरणे तुमच्या माझ्या आजूबाजूला घडत असतात आणि माझ्यासारखे तुम्हीही त्याचे मुक साक्षीदार बनत असता.........

लेखकाचे इतर वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/

1 comment:

  1. हे खरे आहे कि अश्या परंपरा आजही लोक मानतात.... सगळ्यात जास्त वाईट वाटत जेव्हा स्वतःला उच्च शिक्षित समजणारा समाज अश्या गोष्टीत आग्रेसर असतो.... आणि अश्या सगळ्या परंपरांची बळी ही मुलीला किंवा महिलेला द्यावी लागते... पुरूष प्रधान संस्कृती मधे नेहमी महिलेचाच बळी दिला जातो

    ReplyDelete