Friday, February 23, 2018

पॉल, त्याची 'मिलिटरी सर्व्हिस' आणि मी

पॉल आणि ओवेन. मला इंडोनेशियामध्ये मिळालेले मित्र. दोघंही साऊथ कोरियाचे. दोघं अभियांत्रिकी क्षेत्रात प्रयोगशील अाहेत.  आम्ही तिघं आणि थायलंडची एक सहकारी असे एकाच प्रोजेक्टवर काम करत होतो. हे काम करत असताना आपापल्या देशाबद्दल सांगणं व्हायचं. चर्चा व्हायची.

एकदा असंच काम संपवून रात्री उशीरा चहा घेत असताना अचानक पॉल वैतागून बडबड करायला सुरू झाला. तो तसा एकदम भारी पोरगा. पण त्यादिवशी अचानक त्याचा संयम संपला. साचलेलं सगळं फ्रस्ट्रेशन बाहेर काढू लागला. 
डावीकडून यूआय (थायलंड), पॉल, आहो (प्रोजेक्ट असिस्टंट, इंडोनेशिया) आणि खालील बसलेला ओवेन

साऊथ कोरियामध्ये पुरूषांना मिलिटरी सर्व्हिस बंधनकारक आहे. बंधनकारक म्हणजे काय तर १००% कंम्पलसरी. नो पळवाट. बरं ही सेवा एक दोन महिने नाही तर तब्बल दोन वर्ष अर्थात २४ महिने. या कालावधीत घरी जायचं नाही. फोन वापरायचा नाही म्हणजे नाही. सुट्ट्या वगैरे देखील किरकोळ. तिथल्या वरिष्ठांसाठी यात सहभागी होणारी पोरं म्हणजे बकरेच. जसं आमच्याकडं माध्यमात काम करणारे इंटर्न... पाणी निघेपर्यंत राबवून घेणार पण बायलाईन देणार नाहीत. काही जणांना थेट सैन्यात तर काहींना पोलीस दलामध्ये ही मिलिटरी सर्व्हिस मिळते. पोलीस दलात ज्याला संधी मिळेल. त्याला तुलनेनं जरा थोडी मोकळीक. उत्तर कोरियासोबत असलेल्या तणावाच्या संबंधामुळं ही मिलिटरी सर्व्हिस आहे. म्हणजे सतत युद्धासाठी सज्ज असायला हवं.

इंडोनेशियातून वापस गेल्यानंतर त्याला मिलिटरी सर्व्हिस मध्ये सहभागी व्हायचं होतं. आंतरराष्ट्रीय फेलोशिपवर काम करत असताना देखील मिलिटरी सर्व्हिसमध्ये जायच्या प्रचंड दडपणाखाली तो होता. त्या विचारानं तो वैतागला होता. पुढचे २४ महिने त्याच्या जीवनाचं सूत्र बदलणारे असतील. त्याची इच्छा आहे की नाही हा मुद्दा तिथं नाहीच. या सगळ्या प्रकारानंतर पुढचे अनेक दिवस मिलिटरी सर्व्हिस आमच्या चर्चेच्या केंद्रस्थानी होती. कदाचित त्याच्या देशात तो हे जर बोलला तर त्याला देशद्रोही, कमजोर समजलं जाईल. त्यामुळं तो इथं आतलं सगळं बोलू शकत होता.

ओवेनही वापस गेल्यानंतर पॉलच्या आधी ही सर्व्हिस जॉईन करणार आहे. पण तो याबद्दल काही बोलत नव्हता. त्यानं हे स्विकारलं होतं. गुरूवारी तो जॉईनही झाला. व्हॉट्सअपवर त्याच्याशी बोलणं झालं. राष्ट्रभक्ती वगेरैनं तो काही प्रेरित झालेला वाटला नाही. आपल्याकडच्या सारखंच त्याला राष्ट्रभक्तीचे डोस पाजण्याचा प्रयत्न झाला असेल.

पॉल पुढच्या आठवड्यात जॉईन होईल. त्यानंतर कित्येक महिने त्याच्याशी बोलणं होणार नाही. कदाचित वापस आल्यानंतर त्याच्यात आत्ताचा पॉल सापडणार नाही. त्यानं सांगितलेल्या अनुभवांनी माणसातला बदल हे या सर्व्हिसचं महत्त्वाचं प्रोडक्ट असल्याचं कळलं होतं. तो वापस येईल तेव्हा त्याच्यातला तो प्रयोगशील अभियंता जीवंत राहिलेला असतो का ? माहिती नाही.

त्याचं सगळं ऐकताना मला जर्मनीच्या सोफी शॉलचा बाय फ्रेंड  आठवत असायचा. सोफी शॉलचा  काळ १९४० च्या दरम्यानचा. तिच्या जीवनातील शेवटच्या काही दिवसांवर चित्रित सिनेमा मला जास्त भावलेला आहे. १९४३ मध्ये दुसर्या महायुद्धाला आणि हिटलरला विरोध करत शांततेची मागणी करणार्या तिला देशद्रोही ठरवून देहदंडाची शिक्षा सुनावली जाते. ती दिली जाते. ती जेलमध्ये असताना तिच्या बोलण्यातून  बॉयफ्रेंडचे संदर्भ येतात. तो त्या सिनेमात कुठंही नाही. फक्त संदर्भांमध्ये आहे. शॉलला देहदंड दिला जात असताना तो ईस्ट फ्रंटवर मिलिटरी सर्व्हिस अंतर्गत लढत असतो. तो तिकडं लढत असताना त्याच्या जीवनातील महत्त्वाची माणसं इकडं संपवली जात असतात.

हे सगळं ऐकताना, एक प्रकारे आपल्या वैचारिक पूर्वजांनी आपल्याला किती स्वातंत्र्य सुरक्षित आयुष्य दिलंय ? याचा विचार यायचा. अर्थात सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये हे सगळं आपण गमावत चाललो आहोत.

स्वातंत्र्यासोबत पाकिस्तान नामक दहशतीचा व्हायरस आमच्या डोक्यात पेरण्यात आला. हिंदुत्ववादी जर तेव्हा सत्तेत असते आणि पाकिस्तानची भिती निर्माण करून अशीच मिलिटरी सर्व्हिस आमच्यावर लादण्यात आली असती तर ? विचारानंच हादरल्यासारखं होतंय. ज्यावेळी आपण स्वत:ला घडवायची स्वप्न पाहत होतो, त्यावेळी  काश्मीरच्या सीमेवर इच्छा नसताना जावं लागलं असतं तर ... तसं संघाच्या शाखेत जाणं आणि काठ्या चालवणं ही एक प्रकारची बिगर सरकारी मिलिटरी सर्व्हिसच आहे म्हणा. भविष्यात हे बिगर सरकारी धोरण अधिकृत सरकारी बनल तर...

पॉलची ती मानसिक अवस्था समजण्यापलीकडची होती. आपल्यातले अनेक जण हा विचार करून बंडखोर होवू पण असलं काही करायचा नाही असं ठरवतीलही. पण पॉलसाठी नकार दर्शविणं बंड करण्यापेक्षा अवघड आहे.

इंडोनेशियातून परतताना पॉलला तो ज्या दिवशी जॉईन करेल त्यादिवशी त्याच्याबद्दल आणि  मिलिटरी सर्व्हिसबद्दल लिहिन असं म्हणालो होतो. पॉल पुढच्या आठवड्यात जॉईन होणार आहे. कदाचित त्यापूर्वी एकदा त्याच्याशी बोलणं होईल. त्यापूर्वी हे लिहिणं गरजेचं वाटलं. त्यानंतर दोन वर्ष उलटतील. त्याला जवळून ऐकल्यामुळं ही दोन वर्ष म्हणजे किती मोठा बदलांचा काळ असेल हे कळलंय. इंडोनेशियानं मला दिलेल्या अनेक आठवणीमध्ये पॉल, त्याची मिलिटरी सर्व्हिस  कायम अस्वस्थ करत राहिल...

Monday, October 23, 2017

ब्रेन्ट स्टिरटन आणि वन्यजीव छायाचित्र पुरस्कार


यावर्षीचा उत्कृष्ट वन्यजीव छायाचित्र पुरस्कार मिळालेलं ब्रेन्ट
 स्टिरटन यांनं काढलेलं छायाचित्र  
मागच्या दोन चार दिवसांपूर्वी यावर्षीचा उत्कृष्ट वन्यजीव छायाचित्र पुरस्कार जाहीर झाला. मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाचं छायाचित्रण करणाऱ्या ब्रेन्ट स्टिरटन या न्यूयॉर्कस्थित छायाचित्रकाराला हा पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाल्यामुळं त्यानं काढलेल्या छायाचित्रानं जगाला हादरवून टाकलं. वन्यप्राण्यांच्या तस्करीसंदर्भातलं हे छायाचित्र अफ्रिकेमधलं आहे. 
दक्षिण अफ्रिकेतील ल्हूल्हूवे इम्फोल्झी पार्कमधील तस्करीचा बळी पडलेल्या एकशिंगी गेंडयाचं हे छायाचित्र आहे. सदर गेंड्याचं शिंग स्थानिक तस्करांनी काढून नेल्यानंतर ब्रेन्ट यांनं हे छायाचित्र काढलं होतं. हे स्थानिक तस्कर इतरांच्या आदेशावरून ही तस्करी करतात. ह्या गेडंयांचे शिंग चीन किंवा व्हिएतनाममध्ये स्म्गल केले जातात.  
ब्रेन्ट स्टिरटन
एकंदरित पुरस्कारच्या निमित्तानं का होईना पण वन्यप्राण्यांच्या तस्करीचा मुद्दा चर्चेत आला आहे. हा वन्यजीव पुरस्कार नॅचरल हिस्ट्री म्युझिअम यांच्या तर्फे दिला जातो. 

ब्रेन्ट स्टिरटन याच्याविषयी...
ब्रेन्ट याची छायाचित्रं मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष दाखविणारी असतात. ब्रेन्ट याचं काम यापूर्वी National Geographic, NewsWeek, CNNTraveller, The New York Times Magazine, the Washington Post Magazine, The Sunday Times Magazine इत्यादी ठिकाणी प्रकाशित झालं आहे. 
ब्रेन्ट स्टिरटन याच्या गोरिला इन द काँगो स्टोरीतील छायाचित्र
2007 मध्ये ब्रेन्ट स्टिरटन यानं केलेली 'गोरिला इन द काँगो' ही अशीच एक फोटोस्टोरी. ही छायाचित्र न्यूजविकमध्ये प्रकाशित झाल्यानंतर अफ्रिकेतील 9 देशांनी गोरिलांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध राहण्याच करार केला. 
नुकत्याच त्याला मिळालेल्या या छायाचित्र पुरस्कारमुळं प्राण्यांच्या तस्करीविरोधात जागतिक पातळीवर  ठोस पावलं उचलली गेली तर या छायाचित्राचं आणि छायाचित्रकाराच्या कामाचं सार्थक झालं असं म्हणता येईल. 




Friday, August 18, 2017

आझादी के बदलते प्रतिक


तीन दिवसांपूर्वीची घटना. 15 ऑगस्ट, सकाळचे दहा वाजले असावेत. औरंगाबादहून पुण्याकडं निघालो होतो. बस अहमदनगर रोड लागली होती. औरंगबादकडून नगरकडं निघालात की, शहर संपण्यापूर्वी रस्त्याच्या मधोमध ठेवलेला एक रणगाडा (टैंक) लागतो. आजकाल टैंक म्हंटलं की, युद्धाचीही आठवण होत नाही आणि बॉर्डर सिनेमाचीही. फक्त आठवण होते ती राष्ट्रभक्तीची आणि टैंकमार्फत ती रूजविण्याचा सिद्धांत मांडणारे जेएनयूचे कुलगूरू जगदीश कुमार यांची.

सकाळी कॉलेजमधलं ध्वजारोहण आटोपून पुण्याकडं निघायचं होतं. कॉलेजकडं जाताना सकाळी  7 च्या दरम्यान वगैरे सेव्हन हिल चौकात रस्ता ओलांडताना 30 – 35 दुचाकीस्वार पांढरं शर्ट, त्यावर जॅकेट चढवून कर्णकर्कश हॉर्न वाजवत, अर्थात गाडीचा आणि तोंडाचा हॉर्न वाजवत समोरून निघून गेले. गाडीवर उंचच्या उंच झेंडे लावले होते. त्यातल्या मागं असलेल्या दोन तीन दुचाकीस्वारांना सगळ्यांच्या पुढं जायचं होतं म्हणून त्यांच्या गाड्या नो एंट्रीतून घुसून रहदारीच्या विरुद्ध बाजूंनं जोरजोराचा हॉर्न वाजवत निघून गेल्या. अर्थात हे सांगायचं म्हणजे ही होती यावर्षीच्या 15 ऑगस्टची माझी स्वातंत्र्याची पहाट. दिवाळी पहाट सारखं स्वातंत्र्य पहाट असं कोणी काही करत नाही ते एक बरंय म्हणा...

तर वापस अहमदनगर रोडकडं येवू. दरवेळी येता जाता हा रणगाडा कठड्यानं बंदिस्त केलेल्या अवस्थेत तिथंच उभा असतो, एकटाच. त्याच्या जोडीला असतात फक्त धूर सोडत आणि धूळ उडवत जाणारी वाहनं.  15 ऑगस्टला मात्र  त्याला दुचाकी आणि चारचाकींच्या पार्किगनं आणि त्यातून पांढरे कपडे घालून आलेल्या सेल्फी घेण्यात मग्न असलेल्यांनी वेढलं होतं. त्याला बंदिस्त करणाऱ्या कठड्याच्या चारी कोपऱ्यावर तिरंगा लावण्यात आला होता. स्त्री – पुरूष, लहान मुलं - मुली बिनधास्त त्याच्यासमोर उभारून सेल्फी काढत होती. काही मंडळी फेसबुक प्रोफाईल पिक्चर आणि डिपीसाठी रणगाड्याला सॅल्यूट करतानाच्या पोझमधला फोटो काढत होती. हे सर्व फोटो काढत होते, तेही 15 ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्यदिनी म्हणजे त्यांच्यासाठी हा रणगाडा स्वातंत्र्याचं प्रतिक बनलाय का ?  

माझी बस 30 सेकंदात तिथून निघून गेली असेल. हे सगळं पाहताना निर्माण झालेल्या प्रश्नांचं वादळ अजून शमलं नाही म्हणून हा ब्लॉगप्रपंच.. बेसिक प्रश्न पडलाय.  अरे, रणगाडा, कोणत्या स्वातंत्र्याचं प्रतिक असू शकतं आणि कसं. म्हणजे जगदीश कुमांरासाठी ते राष्ट्रभक्ती रुजविण्याचा हत्यार असू शकतं. पण स्वातंत्र्याचा काय संबंध...

मला वाटतं रणगाडा प्रतिक आहे हिंसेचं, वर्चस्ववादाचं, आक्रमणाचं, क्रुरतेचं आणि दहशतीचं. आपल्या मुर्खात काढण्यासाठी सांगण्यात आलेल्या सामर्थ्याचं.  रणगाडा म्हणजे एका अर्थानं यांत्रिक दहशतवादीच. पण ते स्वातंत्र्याचं प्रतिक कसं ठरणार ? 

स्वातंत्र्यदिनाचा आणि रणगाड्याचा काय संबंध. कदाचित आपली स्वातंत्र्याची प्रतिकं बदलत चालली आहेत का ? सतत एकमेकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी आपण मंडळी आपली नवीन वर्चस्ववादी स्वातंत्र्याची प्रतिकं तयार चाललोय का ? स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर निघणाऱ्या प्रभात फेऱ्या दुचाकीस्वारांच्या त्या झुंडीत रूपांतरित होण्याचा अर्थ काय ? ‘भारत माता की जयचं रूपांतर त्या दुचाकीस्वारांच्या दहशत निर्माण करणाऱ्या झुंडशाहीच्या ओरडण्यात होतंय ? झुंडशाही आणि स्वातंत्र्य या पूर्णपणे एकमेकांविरोधी नाहीयेक का ?      

आधुनिक पद्धतीनं पारतंत्र्यात जाताना स्वातंत्र्याची बदलती प्रतिकं म्हणजे स्वातंत्र्यांबद्दलच्या आपल्या बदलत्या मानसिकतेची नव्यानं होत जाणारी ओळख आहे. आपल्या लायकीनुसार आपल्याला सगळं मिळतं, सरकार, सिनेमा, कला, जीवन...जगदीश कुमार आपल्या बदलत्या मानसिकतेचं तर प्रतिबिंब नाहीये ना.     


औरंगाबाद शहराच्या सुरूवातीलाच हा टैंक आहे. तो टैंक औलांडून जाणारा लगेच राष्ट्रभक्त होत असावा, म्हणजे औरंगाबादमधले सगळेच राष्ट्रभक्त. तोच रणगाडा स्वातंत्र्याचं प्रतिक बनला असेल तस्लीमा नसरीनच्या स्वातंत्र्यांचं काय... स्वातंत्र्याच्या सकाळचा हा अनुभव अनेक प्रश्नांना जन्म देवून जातोय. अनेकांच्या डोक्यात अनेक प्रश्न पडले असतील. पुण्यात पोहचल्यावर अनेकांना बोललो ही याबद्दल पण स्वातंत्र्याचं प्रतिक रणगाडा ? याचं उत्तर मात्र मिळत नाहीये.  जर रणगाडा स्वातंत्र्याचं प्रतिक असेल तर सरकारनं आता यापुढं युद्धासाठी रणगाडे न बनवता सरकारी कार्यालयं, चौक, सिनेमागृह, शाळा, कॉलेजांमध्ये बसविण्यासाठी त्यांची निर्मिती करायला हवी...

Friday, January 22, 2016

Drought Memory 1 : पाणीवाला

तुमच्याकडे नगरसेवकाचा, आमदार – खासदाराचा नंबर नसला तरी चालेल, पण पाणीवाल्याचा नंबर असायलाच हवा. राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवरील जनरल नॉलेज नसेल तरी चालेल पण तुमच्या भागातील पाणीवाला कोण ? याची माहिती तुमच्याकडे असायलाच हवी. तो राहतो कुठे, किंवा त्याची भेटण्याची ठिकाणं तुमच्या कॉलनीतील कोणाला तरी नक्की महिती असायलाच हवीत. तुमची इच्छा असो किंवा नसो पण तुमच्यातील कोणाचे तरी पाणीवाल्यासोबत चांगले संबंध असायलाच हवेत.
तुम्हाला वाटत असेल आता हे काय नवीनच, पण मराठवाड्यातील अनेक शहरातील ही स्थिती आहे. म्हणजे ज्या शहरांना नगरपालिका, महानगरपालिका पाणी पुरवठा करते. तिथली ही गोष्ट आहे. शहरांमध्ये विविध भागात पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याच्या मोठ्ठाल्या टाक्या उभारल्या आहेत. म्हणजे लातूरमध्ये तर बार्शी रोडला पाण्याची टाकी नावाने ओळखला जाणार परिसरच आहे. त्या टाक्यातंर्गत विविध प्रभाग असतात. त्या भागात पाणी सोडण्यासाठी जे लोक असतात, ते नगरपालिका, महानगरपालिकांचे  कर्मचारी असतात. पण सामान्य नागरिकांच्या दृष्टीने ते असतात पाणीवाले.
मराठवाड्यातील अनेक शहरांमध्ये कमीत कमी चार दिवसांनी पाणी येतं. मध्ये केव्हा तरी जास्त पाऊस झाला होता, त्यावर्षी मात्र एक दिवस आड पाणी यायचं. पण ते काही जास्त दिवस नाही. मध्ये मध्ये तर १५ दिवसाला पाणी यायचं. आता सध्या २० दिवसाला पाणी येतंय. काही शहरांना तर आता नगरपालिकेकडून होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. नळ हे फक्त घरातील शोभेची वस्तू बनले आहेत.
जाऊद्या आताच्या लेखाचा तो विषय नाही, पुढच्या लेखात वगैरे लिहिन कधीतरी.
तर पाणीवाला हा जो व्यक्ती आहे, तो आवर्षणग्रस्त शहरांतील सर्वांसाठी जास्तच महत्त्वाचा. म्हणजे  पाणी कधी येणार आहे, कधी नाही. कोणत्या वारी पाणी येणार. किती वेळ पाणी असेल याच्यावर सर्व नियंत्रण या गड्याचं. नागरिकांच्या रोषाला आणि आभारालाही सामोरे जाणारा हाच. कधी त्याच्याबद्दल चांगलं तर कधी त्याच्याबद्दल वाईटही बोललं जाणार. पण सगळ्यांच्या जीवनात याचं स्थान थोडं फार तर असणारच. म्हणजे आता लातूरात पाणी येऊन १८ दिवस झाले. मग सगळे एकच म्हणतात, पाणीवाल्याला विचारून या की, कधी पाणी सोडणार आहे, मग दररोज वेगळी वेगळी माणसं जातात आणि त्याला विचारून येतात. मग तो ही सांगतोय, दोन दिवसांनी. पाणी नसल्यामुळे टप्प्याटप्याने पाणी सोडायला चालू आहे. तुमच्या भागाचा नंबर दोन दिवसांनी येईल. मग त्यांनं तिकडून तसं सांगितलं की, लोकं तळ गाठलेले घरातले सिंटेक्स, टाक्या, हौद साफसफाई करायला सुरूवात करतात. कारण पाणी आल्यानंतर ते पाणी पुढचे २० एक दिवस वापरायचं असतात (आता हे वाचून काहींना मळमळ व्हायला सुरूवात होईल, पण हे वास्तव आहे). त्यामुळे साठवायच्या वस्तूंची साफ सफाई केल्याशिवाय पर्याय नसतो.
तसं या सर्व भागांमध्ये पाणी येण्याची काही ठरलेली वेळ नसते. म्हणजे पूर्वी जेव्हा वार ठरवून दिलेले असायचे तेव्हाही काही ठराविक अशी वेळ नसायची. मग लोक दिवसभर वाट बघत बसणार. घरगुती कार्यक्रम, लग्न यांचे मुहूर्तही पाणी येण्याचा दिवस सोडून. म्हणजे मुहूर्त बघण्याची पद्धत एवढीच, ज्या दिवशी पाणी येणार आहे तो दिवस सोडून कधीही कार्यक्रम, लग्न करा. मग कधी सकाळी चारला, कधी रात्री १२ ला, कधी रात्री २ ला, कधी दुपारी अशी पाणी येण्याची वेळ. आता या सगळ्या मागं पण पाणीवाल्यांचं एक गणित असतं. एका भागाला पाणी सोडलं की, पुन्हा टाकी भरायला वेळ जातो. त्यात लाईट असली तर बरं, नाही तर सगळं बोंबललं म्हणून समजा... टाकी भरली की लगेच पाणी सोडायचं, त्याला वेळ काळ नावाचं काही बंधन नाही. रात्री पाणी सोडायचं असलं की हा पाणीवाला त्या त्या भागात जाणार, ओरडून ओरडून लोकांना उठविणार, पाणी सोडतोय सांगणार. मग जी लोकं उठली ती इतर न उठलेल्यांना उठविणार, आणि मग हा जाऊन पाण्याचा वॉल्व्ह सोडणार. तोपर्यंत लोक पाईप वगैरे लावून, मोटारी लावून तयार. मग रात्री २ वाजता पाणी भरायचं. पूर्वी सरासरी २ तास पाणी असायचं. घरातल्या स्त्रियाही कपडे – भांडे वगैरे सगळं तेव्हाच धुवायच्या, म्हणजे कसं नंतर साठविलेल्या पाण्यातलं पाणी उडणार नाही. मग काय तो पर्यंत सकाळच व्हायची. दुसऱ्या दिवशी पाणीवाल्याचं कौतूकच. सगळ्यांना उठविलं म्हणून.
कधी कधी टाकी पूर्ण भरलेली नसायची पण नियोजन लागावं म्हणून पाणी सोडलं जायचं. पाणी आलं म्हणून सगळेजण आधीचं शिळं पाणी झाडांना वगैरे टाकून देणार. सगळं रिकामं करणार आणि मध्येच जिथं पाण्याची टाकी आहे तिथली लाईट गेली की मग नळाचंही पाणी जाण्याच्या अनेक घटना सातत्याने घडायच्या. टाकी भरलेली नसल्यामुळे पाणीही बंद व्हायचं. म्हणजे हे जरा जास्तच विचित्र प्रकरण असायचं. अशा वेळी लोकांना जेवढा राग येत असेल ना तेवढी कधीच येणार नाही. मग पाणीवाल्याच्या खाणदाणाचा उद्धारच. सगळ्या महिलांचा मोर्चा वळायचा तो पाण्याच्या टाकीकडं. पाण्याची टाकी म्हणजे ह्या पाणीवाल्याचं दुसरं घर. तिथं जाऊन त्याला जाब विचारायचा या रागात सगळ्या निघायच्या. पण त्या पट्ट्यालाही माहिती असायचं की असं काही झालं की आपलं  काही खरं नाही म्हणून तो तिथून गायब व्हायचा. असं अचानक पाणी गेल्यानंतर त्याला भांडायला गेलेल्या लोकांना तो काही आजपर्यंत तिथं भेटला नाही. नंतर लाईट आल्यानंतर पाच -  सहा तासांनी टाकी भरली की पाणी तो पाणी सोडणार आणि मग फिरत फिरत त्या भागात चक्कर मारणार.अशा वेळी त्याची कारणंही ठरलेली. पण त्याचा व्हायचा तेवढा उद्धार झालेलाच असायचा.
कधी कधी रात्री १० वाजता वगैरे पाणी सुटलं की, ते १२ वाजता बंद होणं नागरिकांना अपेक्षित असायचं. पण १ वाजले २ वाजले ३ वाजले तरी पाणी काही बंद व्हायची शक्यता नाही जाणवलं की ठरलेल्या  मराठवाडी टोनमध्ये एक वाक्य सातत्याने तोंडातून निघणार, “मेला, कडूभाड्या पडला वाटतं पिऊन कुठंतरी.” पाण्याच्या बाबतीत जी मंडळी थोडी फार जागरूक असते ती पाणी भरून झाली की नळ बंद करून ठेवणार पण काहींची मात्र मज्जाच असणार गाड्या धुवा. घरं धुवा इथंपासून गटारी धुवायलाही मागं पुढं न पाहणारी माणसं तुम्हांला भेटतील. कुणाला वाटलं तर तो पाणीवाल्याला शोधायला जाणार,भेटला चुकून तर पाणी बंद करायला लावयचं नाही तर रात्रभर पाणी चालूच.
कधी कधी पाणीवाल्याची मात्र चांदी असायची, एखाद्या भागात कोणाचं लग्न असलं, किंवा कार्यक्रम असला की त्याला लोकं नियोजित तारखेपेक्षा आधीच पाणी सोडण्याची विनंती करायचे. अशावेळी काय त्याचं महत्त्व एकदम वाढलेलं वाटणार ? ज्याच्या घरी लग्न आहे त्या घरातला कर्ता पुरूष पाणीवाल्याला भेटायचा प्रयत्न करणार. पण तो काही त्यावेळी भेटायच्या मूडमध्ये नसणारच. घरी गेलं की तिथंही नसणारच. कारण डिमांड वाढलेली असते ना. थोडा फार भाव खाणार पण लोकांच्या विनंतीला ही पाणी सोडणारी मंडळी कधी नाही म्हणायची नाहीत. कारण त्यांनाही माहिती असायचं की लोकांसाठी पाणी काय गोष्ट आहे. त्यात घरी कार्यक्रम म्हटलं की, ‘लोकांना कार्यक्रम कसा होईल याची काळजी कमी आणि आलेल्या पाहुण्यांना पाणी कमी पडू नये याचीच काळजी जास्त’. पाणी सोडलं की, लोकंही आनंदानं त्याला काही पैसे आभार म्हणून देतात.
शाळेतून येणाऱ्या पोरांना पाण्याच्या पाईप लाईनच्या वॉल्व्ह जवळ पाणीवाला दिसला की ही पोरं जोरात सायकल मारत घरी जाणार, ‘पाणी सोडायलंय, पाणी सोडायलंय’ असं सगळ्यांना सांगणार. नळाला पाणी येणारा दिवस आजही रविवारपेक्षा मोठा असतो जिथं २० दिवसाला पाणी येतं तिथं.  म्हणजे कोणालाही पाणीवाला पाण्याचा व्हॉल्व्ह सोडताना दिसला की काहीही कितीही महत्त्वाचं काम असलं तरी पाणी येतंय हे सांगण्यासाठी घरी वापस जाणं ही जितकं त्याला महत्त्वाचं वाटतं तितकं दुसरं काही नाही.
सायकल, सायकलीला अडकवलेला वॉल्व्ह सोडायची (म्हणजे वॉल्व्ह लूज करायची) किल्ली , डोक्यावर टोपी. खाकी पोशाख. अशी पाणीवाल्याची ओळख आजही तशीच आहे. व्यक्ती बदलल्या असतील पण त्याची प्रतिमा तशीच आहे. पाणीवाला हा महापालिकेचा कर्मचारी असला तरी तो ठरलेल्या एकाच सामाजिक स्तरातून आलेला आहे असे जाणवले, कांबळे, गायकवाड, साठे, शेख इत्यादींनाच तिथं १०० टक्के आरक्षण . काही मोजक्या लोकांसाठी हा पाणीवाला थट्टेचा विषयही असतो. पण अशी थट्टा करणारी मंडळी खूप कमी असतील. अनेकांना मात्र दिसतो तो ‘त्यांच्यासाठी पाणी किती महत्त्वाचे आहे हे डोक्यात ठेवून रात्री बेरात्री लोकांना अगोदर उठवून नंतर पाणी सोडणारा पाणीवाला’
कोणाच्याही रक्ताच्या नात्यातील नसतानाही, किंवा वैचारिक नातं नसतानाही, किंवा दररोजचं उठणं – बसणं नसतानाही पाणीवाल्याचं सगळ्यांसोबत एक नातं तयार झालेलं आहे. ते कदाचित फक्त दुष्काळ आणि पाणी यामुळंच.

लेखकाचे इतर वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/

Thursday, December 24, 2015

शोषितांच्या साहित्याला नवीन आयाम मिळणार

उद्या दिनांक २५, २६ डिसेंबर २०१५ रोजी अमर शेख यांच्या गावी म्हणजेच बार्शीला शोषित, श्रमिक, कामगार, स्री यांचे जीवन नव्या स्तरावर आपल्या लेखनीतून ज्यांनी मांडले त्या आण्णाभाऊ साठे यांच्या नावाने सुरू होणारे साहित्य संमेलन पार पडणार आहे.
अण्णाभाऊ आणि अमर शेख ही दोन नावं अशी आहेत की, ज्यांच्या साहित्यामध्ये फक्त मुंबई किंवा महाराष्ट्रातील नव्हे तर अख्ख्या जगातील शोषितांच्या समान दु:खाचे प्रतिबिंब उमटले आहेत. पण त्या साहित्याची हवी तेवढी चर्चा मात्र झाली नाही तर दोघांचीही फक्त उपेक्षाच झाली.
शाळेमध्ये असताना १ अॉगस्ट ला भाषण स्पर्धा आयोजित केलेली असायची. विषय असायचे लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे, सहावीला असताना पहिल्यांदा त्या स्पर्धेत भाग घेतला... त्यानंतर पुढे सलग दहावीपर्यंत या स्पर्धेच्या निमित्ताने अण्णाभाऊ या विषयावर वाचन, लिखान झाले. माझ्या आयुष्यात मला भेटलेला आणि जवळचा वाटलेला पहिला लेखक म्हणजे अण्णाभाऊ. माहिती नाही का? आज विचार करतो तेव्हा टिळकांपेक्षा अण्णाभाऊच मला का भावले असतील याची उत्तरं मिळतातही.
अण्णाभाऊंच्या साहित्यातील नायक वा नायिका ही रानावनात राहणारी, ग्रामीण भागात जगणारी, भोळी - भाबडी पण शोषणाविरुद्ध संघर्ष करणारी होती. अण्णाभाऊंनी उभा केलेला नायक हा सातत्याने व्यवस्थेविरूद्ध बंड करणारा क्रांतीकारक होता. कदाचित तो नायक आमच्या लेच्यापेच्या भूमिका घेणाऱ्या नेत्यांना व साहित्यिकांना झेपलाच नसावा, म्हणून की काय ? अण्णाभाऊंचे साहित्य उपेक्षित राहिले.
काही दिवसाखाली "ख्वाडा" चित्रपट पाहिला. त्यातील नायकाने मला अण्णाभाऊच्या साहित्यातील क्रांतीकारकाचीच आठवण करून दिली. भाऊराव कऱ्हाडे यांना चित्रपटविषयी प्रतिक्रिया देताना मी त्यांना अण्णाभाऊंच्या साहित्यातील नायक आणि चित्रपटातील नायक समान पातळीवर जाणवल्याचे सांगितले होते.
अण्णाभाऊंनी ग्रामीण भागात, रानावनात भटकणाऱ्या स्रीला नायिका बनविलं तेही आमच्या प्रस्थापित साहित्य निर्माण करणाऱ्यांना झेपले नाही. कदाचित ती मंडळीही व्यवस्थेचाच बळी ठरली असावी.
१९५८ च्या साहित्य संमेलनात बोलताना अण्णाभाऊंनी "ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती शोषित कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे." सांगत तत्कालीन राजकीय, सामाजिक आणि अर्थिक हितसंबंधांचा बुरखाफाड केला होता.
उद्यापासून सुरू होणाऱ्या साहित्य संमेलनात या सगळ्यांवर वर्तमान संदर्भात चर्चा होईलच. पण उपेक्षितांचं जगणं मांडणारे साहित्य उपेक्षित राहणार नाही, आण्णाभाऊ आणि अमर शेख यांच्या विचार मरणार नाहीत, त्यांचे साहित्य अजरामर करण्यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत ते पोहचविण्यासाठी धोरणही ठरविण्यात येतील.
काही दिवसांपूर्वी एका बातमीतून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राला प्रमुखच नसल्याचे उघड झाले होते. महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठात हीच परिस्थिती आहे. अण्णाभाऊंच्या साहित्याचे पाईक असणाऱ्या कोणीही का याची दखल घेतली नाही? या बद्दल आश्चर्य वाटते. संमेलनात सहभागी होणारी मंडळी या परिप्रेक्षातूनही अण्णाभाऊंचा व त्यांचा उहापोह करेल अशी अपेक्षा.
मल्लिका अमर शेख यांच्या "मला उद्ध्वस्त व्हायचंय" या पुस्तकात अण्णाभाऊ वारल्यानंतर अमर शेखांची झालेली अवस्था मांडण्यात आली आहे. त्यातून अण्णाभाऊ आणि अमर शेख यांच्या मैत्रीचा बंध समजण्यात मदत होते. अमर शेखांच्या जन्मशताब्दीनिमित्त बार्शीत होणारे अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन शोषितांचा साहित्यातील आवाज बुलंद करेल अशी अपेक्षा. अण्णाभाऊंनी उभा केलेला नायक आजच्या साहित्यात निर्माण करण्यासाठी दंड थोपाटले जावेत.
मी ही अण्णाभाऊंच्या साहित्याचा एक वाचक आणि चाहता म्हणून संमेलनात सहभागी होतोय. संमेलनाला शुभेच्छा.. पुढील दोन दिवसात मला नवीन अण्णाभाऊ सापडेल, कळेल या अपेक्षेन बार्शीच्या दिशेने प्रवास करतोय.

लेखकाचे इतर वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/

Saturday, September 19, 2015

नवे संविधान नेपाळसाठी स्थैर्याचा किरण ठरणार ?


रात्री बाराच्या ठोक्याला नेपाळमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. आठ वर्षाच्या वादानंतर आज नेपाळमध्ये परत एकदा संविधानाचे राज्य परतलेले असेल. विरोध, जाळपोळ, आंदोलने यातून करपून सुलाखून निघालेला नेपाळ या नव्या संविधानाच्या अंमलबजावणीने स्थिर होईल (?) अशी अपेक्षा करण्यास संविधानिक भारतातील एक नागरिक म्हणून काय हरकतही नाही. पण मुळत: संविधानाच्या मान्यतेपासून निर्माण झालेला वाद नेपाळला स्थिरावू देईल का?

आजपासून लागू झालेल्या नेपाळच्या संविधानाने नेपाळला संघराज्य आणि धर्मनिरपेक्ष राज्याचा दर्जा दिला आहे. नेपाळची विभागणी सात प्रांतामध्ये झालेली असेल. प्रतिनिधीमंडळातील सदस्यांची संख्या जनसंख्येवर नाही तर भौगोलिकतेवर आधारलेली असेल.
नेपाळमध्ये सध्या माओवाद्यांनी समर्थन दिलेले सरकार अस्तित्वात आहे. ८ वर्षापूर्वी सत्तेत आल्यावर नवीन संविधान निर्माण करण्याची घोषणा त्यांनी केली. पण दोन वर्षातच सत्तेतून त्यांना पायउतार व्हावे लागले. त्या माओवादी आणि प्रस्थापित पक्ष यांच्यात युती होऊन नवीन सरकार अस्तित्वात आहे. पहिल्यांदा स्थापन केलेली संविधान सभा विसर्जितही करण्यात आली. सध्याचे संविधान हे दुसऱ्यांदा स्थापन केलेल्या सभेने तयार केले आहे. म्हणजेच नव्या संविधानाचा संपूर्ण प्रवास हा अस्थैर्याचाच आहे.
१४ सप्टेंबरला संविधान सभेने नव्या संविधानाचा स्विकार केला, पण त्याचवेळी संपूर्ण नेपाळमध्ये या संविधानाच्या विरोधासाठी आंदोलने मोर्चे चालू होते.
हा विरोध मुख्यत: तीन मुद्दयांभोवती फिरत आहे. विरोध करणाऱ्यांमध्ये मुख्यत: महिला, दलित आणि कट्टर हिंदुत्ववाद्यांचा समावेश आहे. पण या तिनही समूहगटांच्या विरोधाची कारणे भिन्न आहेत.
सध्या सत्तेत असणारे माओवादी व इतर पक्षांचे नेतृत्व हे उच्चवर्णियांच्या हाती आहे. त्या निर्णय प्रक्रियेत दलित समाजगटाचे प्रमाण अत्यल्प असल्याचा आरोप स्थानिक दलित संघटना करीत आहेत. संविधानामध्ये त्यांचे प्रतिबिंब पडल्यामुळे दलित व इतर मागास गटांसाठी असलेल्या कोट्याचे प्रमाण हे कमी करण्यात आल्याचा मुख्य आक्षेप या दलित संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे व इतर काही तरतुदीमुळे दलितांच्या शोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
महिलांना दुय्यम स्थान देणाऱ्या नव्या संविधानातील काही तरतुदींमुळे महिलांनीही बंड पुकारले आहे. एकीकडे महिलांना समानतेची वागणूक देण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न केले जात असताना नेपाळच्या संविधानातील काही तरतुदी या आश्चर्यकारक आहेत. त्यातील एका तरतुदीनुसार नेपाळच्या महिलेने परदेशी व्यक्तीशी विवाह केल्यानंतर त्यांना होणाऱ्या मुलाला नेपाळचे नागरिकत्व मिळण्यासाठी पहिल्यांदा तिच्या पतीने नेपाळच्या राष्ट्रीयत्वाचा स्विकार करणे बंधनकारक केले आहे. हा मुद्दा देशाच्या नागरिकत्वाशी संबंधित असल्यामुळे महिलांचा याला आक्षेप नाही. पण नेपाळी पुरूषाने परदेशी महिलेशी विवाह केल्यानंतर त्यांच्या मुलाला मिळणाऱ्या नेपाळच्या नागरिकात्वासाठी काहीही अट ठेवण्यात आली नाहीये. मग महिलांसोबतच ही असमानता आणि बंधनं का ? यासाठी या महिलांना संविधानातील महिलाविरोधी तरतुदींविरोधात बंड पुकारले आहे.
नेपाळने या नव्या संविधानच्या माध्यमातून धर्मनिरपेक्षतेचे धोरण अवलंबिले आहे. याला देशातील कट्टर हिंदुत्ववादी संघटना राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाने विरोध दर्शविला आहे. त्यांच्या मागणीनुसार नेपाळची हिंदु राष्ट्राची ओळख पुनर्पस्थापित करून द्यायला हवी होती. त्यासाठी त्यांनी जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करण्याचाही मार्ग स्विकारलाच. धर्माच्या नावाखाली जगभर वाढणारी हिंसा लक्षात घेता संविधानसभेच्या धर्मनिरपेक्षतेचे तत्व अवलंबविण्याच्या निर्णयाचे अभिनंदन आणि कौतुक करणे गरजेचे आहे. पण संविधानातील सनातन धर्माची सुरक्षा करणे हे राज्यसंस्थेचो आद्य कर्तव्य मानण्यात आले आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावरही प्रश्नचिन्ह लागले आहे.
दलित, महिला आणि हिंदू यांचा संविधानातीव तरतुदींना असणारा विरोध, आतापर्यंत आंदोलनात गेलेले ४५ बळी नेपाळसाठी स्थैर्याची नवी पहाट निर्माण होऊ देतील का हा मला सर्वांत महत्त्वाचा प्रश्न वाटतो.
माओवाद्यांनी नवे संविधान त्यांच्या शहीदांना समर्पित केले आहे. त्या शहीदांचे स्वप्न आज पूर्ण झाल्याची त्यांची भावना आहे.
तर दुसरीकडे नेपाळच्या संविधानाने अतिशय लिबरल भूमिका घेत एलजीबीटी समुदायाच्या हक्कांचे संरक्षण करणे हे राज्याचे कर्तव्य असल्याची तरतूद केली आहे. अशी तरतूद असणारे नेपाळ हे अशियातील पहिले व दक्षिण अफ्रिका आणि इक्वॉडोरनंतरचे जगातील ३ राष्ट्र ठरले आहे.
नेपाळचे हे नवे संविधान आता तिथल्या नागरिकांसाठी स्थैर्याचे नवे किरण बनू शकेल काय याचे उत्तर मात्र येणारा काळच देईल. पण सध्या तरी नेपाळच्या स्थैर्यासाठी या संविधानाला शुभेच्छा.

लेखकाचे इतर वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/

Tuesday, September 15, 2015

जैविक शेती काळाची गरज,

लेखकाचे इतर वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/